Breaking News

मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?

भाजपची राज्य सरकारवर घणाघाती टीका

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. यावरून, मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करीत भाजपने ठाकरे सरकावर घणाघाती टीका केली आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरून ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करीत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती.
आता मंत्रालयात दारूच्या बाटल्या आढळल्यानंतर भोसले अधिक आक्रमक झाले आहेत. ‘साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारू आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे. मंत्रालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या आणि मंत्रालयातील फायलींमध्ये दारूधार्जिणे धोरण असल्याचा घणाघात तुषार भोसले यांनी केला.
या सरकारने मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलय. मग देवालय कशी उघडणार, अशी विचारणा करीत मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही भोसले यांनी केली आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply