कणकवली ः प्रतिनिधी
राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट कोणत्याही परिस्थितीत पाडणारच. ठाकरे सरकारमध्ये हिंमत असेल तर ते वाचवून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (दि. 3) येथे दिले. सोमय्या यांनी प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी आमदार नितेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते.
सोमय्या म्हणाले, परिवहनमंत्री अनिल परब यांनी सीआरझेडचे उल्लंघन करून दापोली समुद्रकिनारी दोन बंगले बांधले. यातील एक रिसॉर्ट 17 हजार स्क्वेअर फुटांचे आहे. दुसर्या बंगल्याचा तपशील अजून यायचा आहे. समुद्रपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हे बांधकाम असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत पाडावेच लागणार आहे. मिलिंद नार्वेकर यांना आपले बांधकाम तोडावे लागले. त्याच धर्तीवर परब यांनाही आपले बांधकाम तोडावेच लागणार आहे. मुख्यमंत्री यांनी ते बांधकाम वाचून दाखवावे. त्यांना माझे खुले आव्हान आहे.
दरम्यान, संचयनी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई व्हावी. यातील प्रमुख आरोपींची संपत्ती जप्त व्हावी आणि त्यामधून गुंतवणूकदारांना त्यांची ठेव मिळावी या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. संचयनी घोटाळ्याचा तातडीने तपास सुरू करावा, अशी मागणी पोलिस अधीक्षकांना केली असल्याचे सोमय्या म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोटाळेबाज
सोमय्या यांनी या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. मुख्यमंत्री मोठे घोटाळेबाज आहेत. त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 19 बंगले बांधले. एवढेच नव्हे तर ते गायबही केले आहेत, मात्र आम्ही या अनधिकृत बांधकामांचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही, असे सोमय्या म्हणाले.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper