26 धरणे ओव्हरफ्लो, दोन धरणांत 90 टक्के पाणीसाठा
रोहे ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 26 धरणे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. तर उर्वरित दोन धरणात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून ही दोन्ही धरणे भरून वाहण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या वर्षी उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत पिण्यासाठी व शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यात पाटबंधारे विभागाची 28 धरणे आहेत. या धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबरपर्यंत 26 धरणे 100 टक्के भरली असून त्यापैकी 20 धरणातून पाण्याचा विसर्गही केला जात आहे. उर्वरित दोन्ही धरणे भरण्याच्या वाटेवर आहेत. त्यातील कार्ले (ता. श्रीवर्धन) धरणात 98 टक्के तर खैरे (ता. महाड) धरणात सध्या 90 टक्के पाणीसाठा आहे.
रायगड जिल्ह्यातील फणसाड (ता. मुरूड), वावा (ता. तळा), सुतारवाडी (ता. रोहा), आंबेघर (ता. पेण), श्रीगांव (ता. अलिबाग), घोटवडे, ढोकशेत, कवेळे, कोंडगांव, उन्हेरे (ता. सुधागड), रानीवली, कुडकी (ता. श्रीवर्धन), संदेरी, पाभरे (ता. म्हसळा), खिंडवाडी, कोथुर्डे, वरंध (ता. महाड), अवसरे, साळोख (ता. कर्जत), भिलवले, कलोते- मोकाशी, डोणवत (ता. खालापूर), बामणोली, मोरबे (ता. पनवेल), उसरण येथील पाटबंधारे विभागाची धरणे 100 टक्के भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.