पेण : प्रतिनिधी
चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) पेणमध्येही साजरा करण्यात आला. या वेळी अंकुर ट्रस्ट व लोकमंच या संस्था व संघटनेच्या वतीने जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेल्या नाग्या महादू कातकरी यांच्या स्मरणार्थ मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच श्रद्धांजली सभाही घेण्यात आली. जंगल राखणे आणि त्याचे संवर्धन करणे व आदिवासी समाजाचा विकास करणे हीच खरी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे विलास पाटील, डॉ. सुनील पवार, आदिवासी कार्यकर्ते संजय नाईक, गणेश वाघमारे, गजानन पवार, हिरामण शिंगवा, बळीराम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अंकुर अभ्यास केंद्रातील मुलींनी व चाईल्ड हेवन येथील निराश्रीत बालिकांनी या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सभेस आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.