लखनऊ ः वृत्तसंस्था
तब्बल 4737 कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये 75 प्रकल्प उभे राहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने न्यू अर्बन इंडिया थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला मंगळवारी (दि. 5) प्रारंभ झाला. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकारने गरिबांच्या खात्यावर सुमारे एक लाख कोटी रुपये थेट पाठवले, असे प्रतिपादन केले. पंतप्रधानांनी केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामाचेही तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 2014च्या आधी जे सरकार होते त्यांनी शहरांतील योजनांमध्ये केवळ 13 लाख घरे मंजूर केली. त्यापैकी आठ लाख घरे बनवण्यात आली. पीएम आवास योजनेतंर्गत एक कोटी 13 लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली. 50 लाख घरे देण्यात आली. आम्ही घरांच्या डिझाइनपासून निर्मितीपर्यंत सर्व गोष्टी घरे वापरणार्यांना ठरवायला सांगितले. दिल्लीत एसी कार्यालयांमध्ये बसून आम्ही निर्णय घेतलेले नाहीत. सन 2017 आधी आम्ही यूपीसाठी 18 हजार घरे निश्चित केली, मात्र येथील सरकारने 18 घरेसुद्धा बनवून दिली नाही. पैसा होता, परवानगी होती, मात्र जे सत्तेत होते ते नेहमीच कामाच्या आड यायचे. त्यांचे हे कृत्य येथील लोक विसरणार नाही. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर शहरांमधील नऊ लाख गरिबांना घरे बांधून देण्यात आली. 14 लाख घरांचे बांधकाम सुरू आहे. वीज, पाणी, गॅस, शौचालय अशा सेवाही दिल्या जात आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper