शारजा ः वृत्तसंस्था
शारजाहच्या मैदानावर रंगेलल्या टी-20 वर्ल्डकपच्या चित्तथरारक लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्या बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. त्यामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी असलेल्या या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. खराब फॉर्मशी झगडणार्या विंडीजने 20 षटकांत 7 बाद 142 धावा केल्या. ख्रिस गेल, एविन लुईस, शिमरोन हेटमायर आणि कायरन पोलार्ड या विंडीजच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. पदार्पणवीर रोस्टन चेजची झुंजार आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकांत 5 बाद 139 धावांपर्यंतच पोहचता आले. जेसन होल्डर आणि अकिल हुसेन यांनी किफायतशीर गोलंदाजी केली. विंडीजच्या पूरनला सामनावीर पुरस्कार मिळाला. बांगलादेशचा हा सलग तिसरा पराभव असल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.