नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जपानची राजधानी टोकियो शहरात 2020 साली रंगणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता भारतीय हॉकीसंघासमोर नामी संधी आलेली आहे. 6 ते 15 जूनदरम्यान भुवनेश्वर येथे रंगणार्या हॉकी सिरीज फायनल स्पर्धेत भारतासमोर जपानचा अपवाद वगळता एकही संघाचे आव्हान नाही. सलामीला भारत रशियाशी भिडेल. त्यामुळे सलामीचा सामना भारताला सोपा जाईल असे म्हटले जातेय.
या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा समावेश अ गटात करण्यात आलेला असून, भारताला पोलंड, रशिया आणि उझबेगिस्तानचा सामना करायचा आहे; तर ब गटात दक्षिण आफ्रिका, जपान, अमेरिका आणि मेक्सिकोचा समावेश करण्यात आला आहे. 6 जून रोजी रशियाविरुद्ध सामना झाल्यानंतर भारतीय संघाला 7 जून रोजी पोलंड आणि 10 जूनला उझबेगिस्तानशी दोन हात करायचे आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारताला जपानचा अपवाद वगळता एकही संघाचे आव्हान नाहीये. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी भारतीय संघासमोर ही नामी संधी असल्याचे बोलले जाते.