Breaking News

कर्जत दहिवली येथील त्या तीन मुली सापडल्या नागपुरात

कर्जत : बातमीदार

नगरपालिका हद्दीतील दहिवली येथील तीन अल्पवयीन मुली सोमवारी शाळेतून घरी परत आल्या नाहीत, अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तीन मुली नागरपूर रेल्वे स्थानकात पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान, त्या मुलींना आणण्यासाठी कर्जत पोलिसांचे पथक नागपूर येथे रवाना झाले आहे.  कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली इंदिरानगर आणि बामचा मळा या भागातील तीन शाळकरी मुली 13 डिसेंबर रोजी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. त्या नेहमीच्या वेळी घरी पोहचल्या नाहीत, म्हणून बामचा मळा येथील मुलीच्या नातेवाईकांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या दहावीमध्ये शिकणार्‍या मुलीबरोबर 16 आणि 17 वर्षाच्या आणखी दोन मुली हरवल्या होत्या. त्या तीन मुली आणि एक तरुण असे चौघे विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात उतरताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून आले होते. त्या अल्पवयीन तरुणाला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या मुली चंदीगडला जाणार असून डहाणू गाडीने नागपूरकडे निघाल्या असल्याची माहिती त्या तरुणाने पोलिसांना दिली. त्याची माहिती व त्या मुलींचे फोटो कर्जत पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यांना पाठवून तपास घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार या तिन्ही मुली नागपूर रेल्वे स्थानकात चंदीगडकडे जाणार्‍या गाडीची वाट पाहत बसल्या असता  तेथील रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याची माहिती 14 डिसेंबर रोजी सायंकाळी कर्जत पोलिसांना दिली. कर्जत येथून बेपत्ता झालेल्या त्याच मुली असल्याची खातरजमा झाल्यानंतर त्यांना आणण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्याचे पथक नागपूर येथे रवाना झाले आहे.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply