नागोठणे : प्रतिनिधी
येथील भाएसोच्या शेठ ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये 59व्या पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात नारनवर म्हणाले की, पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, फेसबुकपासून लांब राहावे. अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका. आताचे हे वय शिकण्याचे आहे तेच चांगलेपणे शिका. तुमची चांगली ओळख तुम्हीच निर्माण करा.
यू-ट्युबला सगळ्या कायद्यांची माहिती आहे. कुठलाच गुन्हा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांकडून कळत-नकळत गुन्हा घडल्यास त्याचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना आयुष्यभर भोगावे लागू शकतात व त्यामुळे सरकारी नोकरी अथवा पोलीस व्हेरिफिकेशन करते वेळी अडचणी येतात, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन, सीईओ कार्तिक जैन, प्राचार्य प्रवीण भारती यांनी पोलिसांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, सावंत, देसाई, विनोद पाटील, प्राचार्य प्रवीण भारती उपस्थित होते.