मुरूड : प्रतिनिधी
शहरातील सागरी किनार्यावर आज जिथे पाहावे तिथे शेवाळच दिसून येत आहे. नवाबाचा राजवाडा ते शहरातील कोळीवाडा परिसर हा तीन किमीचा सागरी किनारा आहे. आज या संपूर्ण परिसरात जिथे तिथे मोठ्या प्रमाणात शेवाळ नजरेस पडत होते. जोरदार भरतीमुळे खोल समुद्रात उलथापालथ होऊन तळाशी असणारे शेवाळ उखडून ते किनार्यावर आलेले पाहावयास मिळत आहे.
शेवाळ हे माशांचे खाद्य असून याची खूप मोठी उपयुक्तता आहे. खोल समुद्रात अगदी तळाशी ते आढळते. समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात शेवाळ आल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत आमच्या प्रतिनिधीने रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, टोंगा येथे खोल समुद्रात भूकंप झाला आहे. त्याचा परिणाम सर्व ठिकाणच्या समुद्रावर झाला. यामुळे जोरदार भरती व खोल पाण्यात उलथापालथ निर्माण होऊन समुद्राच्या तळाशी असणारे शेवाळ किनार्यावर आले आहे. खोल समुद्रात धुके व समुद्राच्या पाण्याचा जोरदार प्रवाह यामुळे मच्छीमारांना जाळे सुद्धा टाकता येत नाही. हळूहळू सर्व बोटी किनार्यावर येत असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.