Breaking News

महाराष्ट्र निर्बंधमुक्त!

  • भाजपच्या मागणीनंतर अखेर सरकारचा निर्णय
  • आता मास्कही ऐच्छिक
  • गुढीपाडव्यापासून सर्व सण जल्लोषात

मुंबई : प्रतिनिधी

भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर गुरुवारी (दि. 31) अखेर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे या वेळी गुढीपाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको, मास्कचा वापर हा ऐच्छिक असल्याची माहिती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

राज्यातील बहुतांशी लोकांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बर्‍याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोना निर्बंध हटवले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आता राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढता येणार आहे. तसेच रमजानचा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहाने साजरा करता येणार आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांचीदेखील काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले केले आहे.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply