Breaking News

पेण वाशी विभागात गढूळ पाणी

ग्रामीण जलपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन; नागरिक संतप्त

पेण ः प्रतिनिधी

तालुक्यातील खारेपाट भागामध्ये सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे, मात्र भाविकांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गढूळ पाणी प्यावे लागल्याने संतापाची लाट पसरली. मागील अनेक वर्षांपासून खारेपाट विभागातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठल वाडी, बोर्झे, लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होंबा गावांसह अनेक वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. दरवर्षी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समितीच्या माध्यमातून आराखडा आखला जातो आणि त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो, परंतु इतर वेळीदेखील येथील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सध्या यात्रांचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे येणार्‍या नागरिकांना किमान दोन दिवस तरी मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा याकरिता वाशी ग्रामपंचायतीने 7 एप्रिल रोजी पेण ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पत्र दिले होते. अधिकारी राठोड यांनी वाशी सरपंचांना आश्वसित केले, मात्र यात्रेच्या एक दिवस अगोदरसुद्धा पाणी आले नसून दुसर्‍या दिवशी अतिशय गढूळ, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी आले. अखेर यात्रेकरीता आलेल्या भाविकांसाठी नागरीकांनी पेण शहरातून पाणी विकत आणून त्यांची तहान भागवावी लागली यामुळे येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

 

हेटवणे धरणासह सिडकोच्या पाणीपुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे कॅनालमधून पाणी सोडता आले नाही. या दिवसांसाठी त्यांच्याकडे नियोजन नव्हते. ते वडखळला देण्यात आले. बंद यंत्रणेमुळे वाशी गावाला पाणीपुरवठा करता आले नाही. शहापाडा धरणातील पाणी कमी झाल्याने काही अंशी ते गढूळ आले. आता पाणीपुरवठा सुरू आहे.

-आर. एम. राठोड, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पेण

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply