राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे अवघड असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, अशी भूमिका घेतली आहे. आता ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी 4 मे रोजी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात पावसाळ्यात वादळी-वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये निवडणुका घेणे अडचणीचे होईल. 4 मे रोजी जर ओबीसी आरक्षणावर निर्णय आला, तर त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात जून आणि जुलै जाईल. त्यामुळे जून-जुलैमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही, असे कारण निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper