Breaking News

रायगडात भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर; खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन

अलिबाग ः प्रतिनिधी

गेली दोन वर्षे अतिवृष्टी आणि वादळांमुळे रायगड जिल्ह्यातील भाताची उत्पादकता कमी झाली. त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने भाताची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे. यंदा प्रती हेक्टरी दोन हजार 815 किलोग्रॅम भाताचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे.  भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे. त्याचबरोबर उत्पादकतादेखील कमी होत आहे. 2017-18च्या खरीप हंगामात भाताची उत्पादकता प्रती हेक्टरी दोन हजार 622 किलोग्रॅम होती. 2018-19मध्ये ती वाढून दोन हजार 805 किलोग्रॅम झाली, मात्र 2019-20मध्ये उत्पादकता घटली. ती प्रती हेक्टरी एक हजार 999 किलोग्रॅम झाली. 2021-22मध्ये यात थोडी वाढ झाली. प्रती हेक्टरी दोन हजार 62 किलोग्रॅम उत्पादन झाले. 2021-22च्या हंगामात प्रती हेक्टरी दोन हजार 243 किलोग्रॅम उत्पादन झाले. यंदा खरीप हंगामात रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख सहा हजार 263 हेक्टरवर भात लागवडीचे क्षेत्र असणार आहे. गेल्या वर्षी 94 हजार 436 हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. याशिवाय जिल्ह्यात 5187 हेक्टर नागली पिकाखालील क्षेत्र आहे. यातील 3640 हेक्टरवर यंदा नागली पिकांची लागवड अपेक्षित आहे, तर दोन हजार 415 हेक्टरवर तूर लागवड अपेक्षित आहे. दरम्यान, पावसाळा जवळ आल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत.

बियाणे, खतांची शासनाकडे मागणी

यंदाच्या खरीप हंगामासाठी 25 हजार 100 क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यात 22 हजार 750 क्विंटल सुधारित, तर 250 क्विंटल संकरीत भात बियाण्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 20 हजार 20 मेट्रीक टन खतांची मागणी जिल्हा कृषी विभागाने केली आहे.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply