
मुरूड ः प्रतिनिधी
सुटीचा शेवटचा हंगाम असल्याने मागील दोन दिवसांपासून मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलला आहे. हॉटेल व लॉजमध्ये तुडुंब गर्दी पहावयास मिळत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने समुद्रकिनारी रस्त्यावर ट्रॅफिक पहावयास मिळाले.
उंटस्वारी व घोडागाडीचा मनमुराद आनंद घेताना पर्यटक दिसत होते. स्वतःची वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांची बेसुमार गर्दी जंजिरा किल्ला पहावयास मिळाली. राजपुरी येथे गाड्या पार्क करून जेट्टीवरून शिडाच्या होड्यांद्वारे किल्ल्याकडे पर्यटकांना नेले जाते. रविवारी सकाळपासूनच समुद्रकिनारी असंख्य पर्यटक विविध भागातून कुटुंबासह मोठ्या संख्येने समुद्रकिनारी दाखल झाले आहेत.
पर्यटकांनी मुरूड समुद्रकिनारच्या हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व फार्महाऊस यांना पसंती दिल्याचे दिसून येते. मुरूड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला, काशीद, कोर्लई किल्ला, चिकणी, बारशीव, सवतखडा, दत्तमंदिर, गारंबी अशा विविध पर्यटनस्थळावर गर्दी केली आहे.
पर्यटकांना आकार्षित करण्यासाठी विविध हॉटेल, रेस्टॉरंटच्या मालकांनी कोकणी, गोमंतक, कोळी, आगरी अशा मासांहारी पदार्थांची मेजवानी ठेवली आहे. यामुळे हजारो रूपयांची आर्थिक उलाढाल झालेली दिसून येत आहे.
काशीद व मुरूड समुद्रकिनारा पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. काशीद समुद्र येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक काही तास खोळंबली होती. जिथे पहावे तिथे वाहनांच्या मोठ्या रांगा दिसत होत्या. त्याचप्रमाणे असंख्य पर्यटकांनी समुद्र स्नान याचा आनंद लुटताना पहावयास मिळत होते.
मुरूड, काशीद या ठिकाणी रविवारी 30 हजारांपेक्षा जास्त पर्यटक मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने सर्व हॉटेल, लॉजिंग हाऊसफुल्ल झाले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper