उद्योगांना फटका; उद्योग राज्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याची टीआयएची अपेक्षा
पनवेल : वार्ताहर
नागरी वसाहती प्रमाणे तळोजा एमआयडीसीमध्येही पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मागणीप्रमाणे पाणी मिळत नसल्याने आता कारखानदारांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैसे खर्च होत आहे. त्याचबरोबर उद्योग आणि उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. यासंदर्भात तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)ने थेट उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले. यानंतर तटकरे यांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
तळोजा परिसरात 907 हेक्टर जागेवर एमआयडीसी बसविण्यात आली. या ठिकाणी आजमितीला 823 छोटे- मोठे कारखान्यांची नोंद आहे. त्यामध्ये इंजिनीअरिंग, माशांवर प्रक्रिया, फूड, केमिकल्स आदी कारखानांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात कारखाने आणि औद्योगिक उलाढाल होत आहे. तळोजा एमआयडीसीत दीपक फर्टिलायझर, फूट ग्लास. महाराष्ट्र वखार महामंडळ, किंग फिशर, भारत इलेक्ट्राँनिक्स, बॉम्बे बेवरेज, विस्ता फुड यासारख्या मोठ्या कंपन्यांत आहेत. या ठिकाणी हजारो कामगार काम करतात.
कारखानदारांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. बॉयलर करिता पाण्याची नितांत गरज आहे. वेळेत आणि जास्त दराने पैसे देऊन सुद्धा एमआयडीसी आवश्यक ते पाणी देत नसल्यामुळे कारखानदार हवालदिल झाला आहे. याच प्रश्नावर टीआयएच्या पदाधिकार्यांनी सतीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांची मंगळवारी भेट घेतली.
या वेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तळोजा इंडस्ट्रिजचे अध्यक्ष शेट्टी यांनी एमआयडीसी पाण्याची पाईपलाईन बांधणे, व्ही आणि टी ब्लॉकमधून जाणार्या पाइपलाइन वळवून ती अभियांत्रिकी व केमिकल झोनपर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव दिला. हे पाऊल केमिकल आणि इंजिनिअरिंग झोनमधील पाण्याची समस्या कमी करेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कारण पाणी नंतर उच्च गुरुत्वाकर्षणाने वाहू शकते, कारण पाण्याच्या पाइपलाइनच्या भौगोलिक संरेखनामुळे, जी उताराच्या मार्गावर चालते असेही सतीश शेट्टी यांनी सांगितले. राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी एमआयडीसीला त्यानुसार अतिरिक्त पाइपलाइन बांधण्याच्या सूचना केल्या. या मंजुरी करता सहा महिन्यांचा कालावधी लागेल असे अधिकार्यांनी या वेळी सांगितले. त्यानुसार त् कार्यवाही करण्याबाबत सांगण्यात आले. या वेळी उद्योग विभागाचे सहसचिव,संजय देऊळगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी कटकधोंड यांच्यासह तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
एमआयडीसीकडून आता बिगर औद्योगिक पाणीपुरवठा कमी करून हे पाणी उद्योगांना देण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता यशस्वी एस. व्ही. राऊत यांनी बैठकीमध्ये सांगितले.
40 ते 45 एमएलडी पाण्याची आवश्यकता
तळोजा औद्योगिक वसाहतीसाठी 40 ते 45 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु सध्याला सुमारे 15 एमएलडी पाणी कमी मिळत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही पाणी टंचाई गंभीर समस्या बनली आहे.