Breaking News

रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील आपटा गावाच्या हद्दीतील पाताळगंगा नदीवर रेल्वेपुलालगत पादचारी जोडपूल तत्काळ बांधण्यात यावा. तसेच रेल्वे अपघात घडल्यास त्याबाबत योग्य तपास करण्यासाठी तपास यंत्रणेला मदत व्हावी, या उद्देशाने रेल्वेचे इंजिन आणि शेवटच्या डब्याला उच्चप्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीच्या बैठकीत करण्यात आली

झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक नुकतीच मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे, सल्लागार समिती सदस्य अभिजित पाटील, एनआरयुसीसीचे नवनिर्वाचित सदस्य अजयकुमार दुबे, डॉ.आसिफ पटेल, रवींद्र पाटील यांच्यासह सर्व सल्लागार समिती सदस्य आणि मध्य रेल्वेचे अधिकारीवर्ग उपस्थित होते.

पनवेल तालुक्यातील आपटा गावाजवळ असणार्‍या पाताळगंगा नदीवरील रेल्वे पुलावर आजपर्यंत 50 हुन अधिक अपघात घडले आहेत. यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण रेल्वे अस्तित्वात आल्यापासून या रेल्वे पुलावर पादचारी जोडपूल नसल्याने आपटा व पंचक्रोशीतील गावे आणि आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना जाताना 12 ते 15 किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. परंतु नदीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला जोडणार्‍या गावांना या पुलाच्या वापरामुळे हेच अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पार करता येते. परंतु याठिकाणी रेल्वे पुलाला पादचारी जोडपूल नसल्याने अनेकदा पादचार्‍यांना अपघातात नाहक आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे या रेल्वेपुलाला जोडून पादचारी जोडपूल बांधावा अशी मागणी सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली.

आपटे गावातील एक तरुण दाम्पत्य 7 फेब्रुवारी 2022 रोजी  रेल्वे पूल पार करताना याच रेल्वे पुलावर दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला होता, परंतु हा अपघात नेमका कसा झाला, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला याबाबत तपास करताना तपास यंत्रणेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे रेल्वे अपघाताची योग्य माहिती मिळण्यासाठी रेल्वे इंजिनचा डब्बा आणि शेवटच्या डब्ब्यावर उच्चप्रतिचा सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्यास रेल्वे मार्गावर झालेला अपघात हा घातपात, आत्महत्या, रेल्वेची धडक, पादचार्‍यांचा हलगर्जीपणा किंवा अन्य कोणत्या कारणाने झाला आहे याबाबत योग्य माहिती मिळेल आणि तपासाला गती मिळेल, या हेतूने सदरची मागणी  रेल्वे महाप्रबंधक यांच्याकडे करण्यात आली.

या बैठकीस उपस्थित असलेले सल्लागार समितीचे सदस्य खासदार जयसिद्धेश्वरस्वामी यांनी रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन राज्य सरकार व रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून यातून योग्य मार्ग काढावा असे निर्देश मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अजयकुमार लाहोटी यांना दिले. तसेच लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नियोजित बैठक करून हे प्रश्न सोडवण्याबाबत आश्वासन दिले आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Leave a Reply