Breaking News

आजपासून सिंगल युज प्लॅस्टिकवर कारवाई

पनवेल मनपा करणार अंमलबजावणी

पनवेल ः प्रतिनिधी

केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमानूसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल युज प्लॅस्टिकवर संपूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात शनिवार (दि. 16)पासून सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

या प्लॅस्टिकबंदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी व नागरिकांना व्हावी, यासाठी महापालिकेच्यावतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिंगल युज प्लॅस्टिक बंदीवर कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते.

या वेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे रायगड जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी  व्ही. व्ही. किल्लेदार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, क्षेत्रीय अधिकारी ए. एस लोहिया, योगेश देशमुख, मीना पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड, सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता विभागातील अधिकारी, पनवेल, कळंबोली, कामोठे येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी, प्लस्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यशाळेत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात शनिवार (दि.16)पासून सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून व्यापारी वर्गासाठी प्रबोधनपर मार्गदर्शक माहितीपट दाखविण्यात आला, तसेच सिंगल युज प्लॅस्टिक बंदी कायद्याविषयी माहिती सांगण्यात आली. सिंगल युज प्लॅस्टिकमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो हे सांगण्यात आले, तसेच व्यापार्‍यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्लॅस्टिकच्या वापराबाबत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नागरिक व व्यापार्‍यांसाठी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचेही आवाहन या वेळी करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने शनिवारपासून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सिंगल युज प्लॅस्टिकमध्ये कोणकोणत्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे, कोणकोणत्या वस्तूंना परवानगी देण्यात आली आहे, या विषयावर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या तळ मजल्यावर शुक्रवार (दि. 15)पासून पुढील 14 दिवसांसाठी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, नागरिक, व्यापारीवर्गाने घ्यावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply