मुंबई ः प्रतिनिधी
राज्यातील विविध 20 जिल्ह्यांतील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील सहा हजार 719 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
सहारिया यांनी सांगितले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 31 मे ते 6 जून या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून या दोन सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून रोजी होईल. 10 जूनपर्यंत
नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 23 जून रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 वाजेपासून दुपारी केवळ 3.00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणची मतमोजणी 24 जून रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : पालघर 7, रायगड 8, रत्नागिरी 1, नाशिक 74, धुळे 1, जळगाव 1, अहमदनगर 10, पुणे 3, सातारा 3, सांगली 1, कोल्हापूर 1, उस्मानाबाद 1, लातूर 2, नांदेड 1, अकोला 1, यवतमाळ 3, वाशीम 1, बुलडाणा 1, वर्धा 4 आणि चंद्रपूर 22. एकूण 146.
पोटनिवडणूक होणार्या सरपंचपदाच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे 1, पालघर 2, रायगड 10, रत्नागिरी 5, सिंधुदुर्ग 1, नाशिक 3, अहमदनगर 1, नंदुरबार 2, पुणे 3, सोलापूर 1, सातारा 6, औरंगाबाद 4, नांदेड 8, उस्मानाबाद 2, परभणी 1, वाशीम 5, बुलडाणा 1, चंद्रपूर 1 आणि भंडारा 5. एकूण 62.
दरम्यान, या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper