पनवेल : प्रतिनिधी
दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून अक्षता मयूर म्हात्रे, प्रभाग 3 मधून मनोहर मारुती पाटील, वैशाली कैलास पाटील व हर्षदा सुजित पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये दिघाटी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे अनिवार्य असते, मात्र शेकापच्या विजयी उमेदवारांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांना पाच वर्षाच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा असा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने रिक्त झालेल्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. यामध्ये चार भाजप उमेदवारांच्या विरोधात कोणतेही उमेदवारी अर्ज आले नाहीत. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper