Breaking News

राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक विवेकानंद बालापल्ली यांनी दिली आहे.

प्रत्यक्षात 8 ते 9 ऑगस्टला विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे मंत्र्यांनी घोषित केलेला 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारने फेब्रुवारीमध्ये टेंडर दिल्याने महाराष्ट्रापेक्षा आधी कर्नाटकमध्ये प्रयोग सुरू झाला आहे. औरंगाबादमधील रडारच्या 200 किलोमीटर परिक्षेत्रातच हा प्रयोग होणार आहे, असा खुलासा कृत्रिम पावसासाठी कंत्राट मिळालेल्या कंपनीने केला आहे. यामुळे राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पूर्ण विदर्भात होणार नाही, तसेच मराठवाड्यातीलदेखील काहीच भागात हा प्रयोग होणार आहे, अशी माहिती आहे. यामुळे महाराष्ट्रातील बळीराजाला कृत्रिम पावसासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. मागील आठवड्यात सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत, त्या ढगांवर रासायनिक घटकांची फवारणी कधी करावी याचा अभ्यास सुरू केला आहे. सुमारे 100 कोटी रुपये बजेट असलेला हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरणे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या आवारात बसवण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्य छायेतीस ढगांचा अभ्यास करीत आहेत.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply