Breaking News

कर्जतमध्ये जोरदार पाऊस

काही भागांत पाणी घुसले; नेरळमधील अनेक भागांना तडाखा

कर्जत ः वार्ताहर

मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे कर्जत तालुक्यातील उल्हास नदी, पेज नदी, शिलार नदी दुथडी भरून वाहत होत्या.  रविवारी (दि. 4) सकाळी आठ साडेआठच्या सुमारास कर्जत शहराच्या मध्य भागातून वाहणार्‍या उल्हास नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली त्यामुळे शहरातील पाण्याचा निचरा होणार्‍या मुख्य नाल्यातील पाणी परत मागे फिरू लागले त्यामुळे शहरातील कोतवाल नगर परिसरातील विशाल अपार्टमेंट या इमारतीच्या परिसरात सुमारे साडेचार-पाच फूट पाणी होते. त्यामुळे त्या इमारतीमधील तळमजल्यात राहणार्‍या लोकांनी इमारतीच्या गच्चीवर आश्रय घेतला, या परिसराला लागून असलेला चौक-कर्जत-मुरबाड रस्त्यावरून नदीचे रिटन आलेले पाणी वाहत होते. कोतवालनगर परिसरातील हरपुडे, डॉ. फडके, भोपतराव आदींच्या बंगल्यामध्ये पाणी शिरले होते. तर शनी मंदिर, इंदिरा नगर, बामचा मळा नानामास्तर नगर रेव्हेन्यू कॉलनी या परिसरात पाणी साठल्याचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले. नगर परिषद हद्दीतील ज्या लोकांच्या घरात पाणी घुसले अशा घरात फुड्स पॅकेट नगर परिषदेच्या वतीने वाटण्यात आली. नगर परिषद हद्दीला लागून असलेल्या ज्ञानदीप सोसायटी, मालवाडी परिसर, तसेच नेरळ, जिते, आसल आदिवासी वाडी, हेदवली, बेडसे, शेलू या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे, जिते गावात माणसे आडकली होती. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. कोढींबे येथे एक घर पडले असल्याचे  गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी सांगितले.

कर्जत ः बातमीदार

कर्जत शहरात उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी रविवारी (दि. 4) अनेक नागरी भागात शिरून मोठे नुकसान झाले आहे. पहाटेपासून उल्हास नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. उल्हास नदीच्या तिरावर असलेल्या शनीमंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते, तर समोर असलेल्या बामचा मळा हा भागदेखील पाण्याखाली गेला होता. इंदिरानगर आणि कोतवालनगर, तसेच माळवाडी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने सर्वत्र महापुराने नागरिक चिंताग्रस्त झाले होते, तर कर्जत आमराई पुलाच्या खलील बाजूस असलेल्या विशाल अपार्टमेंटमध्ये शिरलेले पाणी यामुळे परिस्थिती धोकादायक बनली होती. उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीच्या तिरावर असलेल्या गावाच्या आजूबाजूला पाण्याने वेढे दिले होते. वावे, बार्डी आणि बेडसे भागात देखील मोठ्या प्रमाणात गावांच्या आजूबाजूला पाणी दिसून येत होते. उल्हास नदीने पुढे कोल्हारेपासून रुद्ररूप धारण केले होते. वाकस पुलाजवळ असलेल्या पूजा रिसॉर्ट्सचे मागील 10 दिवसांत दुसर्‍यांदा पुराचे पाणी आतमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. कोल्हारे गावातील नदी कडेला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले होते, ते पुराचे पाणी पुढे तळवडे रस्ता उलटून धामोते गावाच्या शिवारात शिरले होते. अनेक तास रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने तळवडे रस्त्याचा काही भाग देखील वाहून गेला आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply