‘मेगाभरती’ने भाजपला बळकटी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; सुधागडात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

पाली : प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  प्रभावी व सक्षम नेतृत्वाखाली सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जात आहे. त्यामुळेच होत असलेल्या मेगाभरतीने पक्षसंघटना अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 12) येथे केले.  सुधागड तालुक्यातील भेलीव पूल आणि जांभुळपाडा -तांबटमाळ डोह पूल या दोन्ही पुलांचे उद्घाटन, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणार्‍या पेडली-नवघर आणि  झाप-आपटवणे या रस्त्यांचे व डोंगरी विकास निधीतून वावे येथे उभारण्यात येणार्‍या सभामंडपाचे भूमिपूजन गुरुवारी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत व अपेक्षित विकास घडवून आणण्यात भाजपप्रणीत सरकार यशस्वी झाले असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. संपूर्ण राज्यात शेकापचे चार उमेदवार विधानसभा निवडणूक लढवतात. त्यातून निवडून येणार किती आणि तुमची कामे करणार किती? अशी बोचरी टीका या वेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शेकापवर केली. सुधागडसह रायगड जिल्ह्यात विद्यमान सरकारच्या माध्यमातून विकासाची गंगा आली आहे. पाच वर्षात तळागळातील जनतेपर्यंत  मोठ्या प्रमाणावर विकासस्त्रोत पोहचविण्याचे काम झाले आहे. भाजपच्या कामगिरीवर जनता खूश आहे. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता देत जनतेने भाजपला पहिली पसंती दिली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून यापुढेही जनतेला अपेक्षित असा सर्वांगीण व शाश्वत विकास घडवून आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष आमदार ठाकूर यांनी या वेळी दिली. माजी मंत्री तथा भाजप नेते रवींद्र पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस राजेश मपारा, बंडू खंडागळे, सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत, तालुका चिटणीस निखिल शहा, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत घोसाळकर, गणपत दळवी, अनिरुद्ध पाटील, मीडिया सेलप्रमुख सागर मोरे, युवा नेते अनुपम कुळकर्णी, जांभूळपाडा सरपंच श्रद्धा कानडे, माजी सरपंच गणेश कानडे, आतोने सरपंच रोहन दगडे, अडूळसे सरपंच भाऊ कोकरे, आपटवणे सरपंच शरद चोरघे, प्रसाद लखिमले, शिरीष सकपाळ, शिवसेनेचे सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, पाली शहरप्रमुख वासुदेव मराठे, केतन देसाई, माजी सरपंच उमेश म्हस्के, विकास माने, विशाल गुरव, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ या वेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

आदिवासी वाड्यापाड्यासह ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत व मूलभूत नागरी सुविधा देण्यावर सरकारने भर दिला आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. या जनहिताच्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा.

-रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply