मुंबई : प्रतिनिधी
यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा बर्याच काळापासून कसोटी क्रिकेटपासून दूर आहे. लवकरच त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेसाठी रिषभ पंतऐवजी साहाला संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत व्यवस्थापनाकडून मिळत आहेत.
साहाला अनुभव आणि यष्टीरक्षण कौशल्यामुळे टीम इंडियात पुन्हा जागा मिळू शकते. भारतीय मैदानांवरील खेळपट्ट्यांवर चेंडू उसळल्यानंतर टर्न घेतो. अशी परिस्थिती साहा चांगल्या पद्धतीने हाताळतो. कसोटी मालिकेसाठी संघात रवींद्र जडेजा आणि आर. अश्विनला स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे, तर साहा हा उत्तम पर्याय आहे, असे मानले जात आहे. गेल्या 18 महिन्यांपासून साहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकला नाही. साहाच्या अनुपस्थितीत संघाने अनेक यष्टीरक्षकांना संधी दिली, परंतु त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. साहाने भारताकडून 32 कसोटी सामने खेळले आहेत. 2018मध्ये दुखापतीच्या कारणांमुळे त्याला खेळता आले नव्हती.
एका वृत्तानुसार, सर्वोत्तम विकेटकीपरची निवड करण्याच्या उद्देशाने संघात दोन विकेटकीपर खेळवण्यात येत आहेत. रिषभ पंतची निराशाजनक कामगिरीसुद्धा साहाच्या पथ्यावर पडू शकते. वेस्ट इंडिज दौर्यात पंत अपयशी ठरला, तसेच डीआरएसचे निर्णयही त्याचे अनेकदा चुकीचे ठरले. त्यामुळे आता पंतऐवजी साहाला पुन्हा संधी मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper