पनवेल : वार्ताहर
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनी संयम व शांतता पाळावी, असे आवाहन आज पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केले. अयोध्या प्रश्नावरील निकाल लवकरच लागणार असून, संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर वपोनि अजयकुमार लांडगे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात शांतता कमिटी सदस्य, सर्वधर्मीय सदस्य, नगरसेवक व इतर मान्यवरांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना वपोनि अजयकुमार लांडगे यांनी सांगितले की, पनवेल हे अत्यंत संयमी व एकोप्याचे शहर आहे. हीच परंपरा सर्वांनी कायम राखावी. समाजात शांतता राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व येणार्या निकालाचा आदर राखावा, असे त्यांनी सांगितले. आगामी काळामध्ये जास्तीत जास्त पोलीस पाटील, शांतता कमिटी, नगरसेवक, मोहल्ला कमिटी यांच्या बैठका घेऊन एकमेकांचा परिचय व संबंध वाढविणार असल्याची माहिती वपोनि अजयकुमार लांडगे यांनी दिली. गेल्या काही दिवसापासून घरफोड्यांमध्ये नेपाळी लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्या संदर्भात सुद्धा घरमालक व दुकानदारांनी जागृत राहावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper