नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज येणार यावरून बराच उहापोह झाला, मात्र भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला याचे ठोस उत्तर न मिळाल्यामुळे भारतीय संघाला वर्ल्डकपमध्ये याचा फटका बसला. या स्पर्धेनंतर निवड समितीने पुन्हा एकदा संघबांधणी करायचे ठरवले आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या मते श्रेयस अय्यर हा भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
‘जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही श्रेयसला साधारण 18 महिन्यांपूर्वी भारतीय संघात स्थान दिले होते. आतापर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये काही अपवाद वगळता श्रेयसने चांगली कामगिरी केली आहे, मात्र दुर्दैवाने आम्ही त्याला अधिक संधी देऊ शकलो नाही. या कालावधीत त्याच्याच एक खेळाडू म्हणूनही सुधारणा झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात वन-डे आणि टी-20 संघात तो चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी चांगला पर्याय ठरू शकतो, असे मत प्रसाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलेे.नुकतच श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत मुंबईकडून खेळताना आक्रमक फलंदाजी केली होती. भारतीय संघ 6 डिसेंबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यास सुरुवात करेल. मध्यंतरी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनानेही श्रेयस चौथ्या क्रमांकावर दीर्घकाळासाठी त्याचा वापर केला जाईल, असे संकेत दिले होते. त्यामुळे विंडीजविरुद्ध मालिकेत श्रेयसच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper