काठमांडू : वृत्तसंस्था
भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडला आहे. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर भारताने सहाव्या दिवशी ही किमया साधली.
कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान (पुरुष 97 किलो फ्री स्टाइल), सुमित मलिक (पुरुष 125 किलो फ्री स्टाइल), गुरशरणप्रीत कौर (महिला 76 किलो) आणि सरिता मोर (महिला 57 किलो) यांनी सोनेरी यश मिळवले.
भारतीय नेमबाजांनी वर्चस्व कायम राखताना तीन सुवर्णपदके प्राप्त केली. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अनिश भानवालाने सुवर्णपदक पटकावले. मग त्याने भाबेश शेखावत व आदर्श सिंगच्या साथीने पुरुषांचे सांघिक विजेतेपद पटकावले. 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात मेहुली घोष आणि यश वर्धन यांनी सुवर्णपदक मिळवले.
जलतरणात भारताने सात सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदक कमावले. श्रीहरी नटराज (100 मीटर बॅकस्ट्रोक), रिचा मिश्रा (800 मीटर फ्री स्टाइल), शिवा एस. (400 मीटर वैयक्तिक मिडले), माना पटेल (100 मीटर बॅकस्ट्रोक), चाहत अरोरा (50 मीटर बॅकस्ट्रोक), लिकिथ एस. पी. (50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक) आणि रुजुता भट (50 मीटर फ्री स्टाइल) यांनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ए. व्ही. जयाविणाने रौप्य आणि 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रिद्धिमा वीरेंद्रकुमारने कांस्यपदक पटकावले.
अॅथलेटिक्समध्ये राशपाल सिंग (पुरुष मॅरेथॉन), मुहम्मद अफसल (पुरुष 800 मीटर), शिवपाल सिंग (पुरुष भालाफेक) यांच्यासह 4 बाय 400 मीटर सांघिक रौप्यपदके भारताने मिळवली. शेर सिंग, ज्योती गवते, शर्मिला कुमारी व महिलांच्या 4 बाय 400 मीटर सांघिक कांस्यपदकांचीही यात भर पडली. वेटलिफ्टिंग प्रकारात भारताच्या शास्त्री सिंगने 190 किलो वजन उचलून 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक कमावले, तर महिलांच्या 87 किलो गटात अनुरुद्धने 200 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवले.