Breaking News

रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील प्रोफेशनल कॉलेजचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने कामोठे येथे प्रोफेशनल कॉलेज अर्थात व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. 

कामोठे सेक्टर 11 येथे झालेल्या या सोहळ्यास ‘रयत’च्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, ‘रयत’चे सचिव भाऊसाहेब कराळे, निरीक्षक संजय मोहिते, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत यांच्यासह  के. के. म्हात्रे, आप्पा म्हात्रे, विजय चिपळेकर, रवी जोशी, भाऊ भगत, रमेश तुपे, वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर, पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, श्री. कारंडे आदी उपस्थित होते.

या वेळी विचार मांडताना डॉ. अनिल पाटील म्हणाले की, कामोठ्यात उभारण्यात येणार्‍या या कॉलेजसाठी 1912 साली प्लॉट घेण्याचे ठरविले होते. संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली असताना शिक्षणासंदर्भात पुढील काळातील होणार्‍या बदलांचे विचार येतात. काळाप्रमाणे तंत्रज्ञान बदलत असते. ते लक्षात घेऊन पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज आहे. येथील प्रकल्पासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जबाबदारी घेतल्याने डॉ. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

कौशल्यपूर्ण शिक्षण महत्त्वाचे : लोकनेते रामशेठ ठाकूर

भावी पिढी बेकार राहू नये यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही सारी मंडळी काम करीत आहोत. त्यादृष्टीने कौशल्यपूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे, असे ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी अधोरेखित केले. पनवेल, नवी मुंबईत व्यवसाय शिक्षणाचे केंद्र व्हावे, असा विचार संस्थेने करून 10 वर्षांपूर्वी तशी मागणी व ठराव केला. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आज कॉलेजचे भूमिपूजन होत आहे. येथून प्रशिक्षित विद्यार्थी घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्था नेत्रदीपक कामगिरी करीत आहे. इस्रोमध्ये देशातील 18-19 मुलांची निवड झाली असून, त्यात महाराष्ट्रातील तिघे आहेत. त्यापैकी एक आपल्या संस्थेचा आहे. याशिवाय ‘रयत’च्या इतिहासात पहिल्यांदाच 22 प्रकल्प पेटंटसाठी पाठविण्यात आले. त्यातील पाच प्रकल्प हे नववीतील एका विद्यार्थ्याचे आहेत. एकूणच ग्रामीण भागातील मुले पुढे येत आहेत.

-डॉ. अनिल पाटील, चेअरमन,

रयत शिक्षण संस्था, सातारा

Check Also

रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते

पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …

Leave a Reply