Breaking News

खालापुरात कार अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू, सहा जण बचावले

खोपोली,  खालापूर : प्रतिनिधी

कोकणातून मुंबईत जाणार्‍या कारला पाली – खोपोली मार्गावर खालापूर हद्दीत झालेल्या अपघातात मंदार सीताराम साळवी (वय 35, रा. जोगेश्वरी मुंबई) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 10) पहाटे घडली. या अपघातात दोन लहान मुलांसह चारजण सुखरूप बचावले आहेत.

मंदार साळवी हे त्यांची पत्नी पूजा (वय30) मुलगा अंश (वय 6), इयांश (पाच महिने), नातेवाईक आनंद सावर्डेकर व अश्वीनी सावर्डेकर, प्राजक्त सुर्वे यांच्या सोबत कोकणात गेले होते. सोमवारी पहाट साडेपाच वाजण्याच्या सुमारास खालापूर हद्दीत अ‍ॅडलॅब इमॅजिकाजवळ समोरून येणार्‍या वाहनाचा अंदाज कार चालविणार्‍या प्राजक्त यांना न आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. व कार रस्त्यालगत अवजड वस्तुला धडकल्याने कारचा टायर फुटला. या धडकेत चालक प्राजक्तच्या शेजारी बसलेले मंदार पुढे फेकले जावून कारच्या काचेवर जोरात आदळले. मंदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंदार यांच्या मांडीवर बसलेला मुलगा अंश आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. कारमधील  इतर पाचही जणांना  खरचटलेसुद्धा नाही. अपघाताची माहिती मिळताचा खालापूर पोलीस, अपघातग्रस्ताच्या मदत पथकाचे गुरूनाथ साठेलकर, विजय भोसले, पूजा साठेलकर मदतीसाठी घटनास्थळी पोहचले. मंदार यांना खोपोली नगरपरिषद रूग्णालयातून शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या अपघाताची नोंद पोलीस हवालदार जे. पी. म्हात्रे यांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply