दासगाव, सापे गावात वादळी पावसाने मोठे नुकसान
महाड : प्रतिनिधी
एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महाड तालुक्यात आलेल्या गारांसह वादळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दासगाव आणि सापे गावात वादळी पाऊस झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचे पोल देखील कोलमडून पडल्याने दासगावमधील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. महाड तालुक्यात शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले आणि अवेळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे महाड तालुक्यातील दासगाव आणि सापे गावात मोठे नुकसान झाले आहे. दासगाव मध्ये वादळी पावसासह गारा देखील पडल्या. अचानक आलेल्या वादळाने येथील शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे छप्पर उडून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. गावातील विजेचे पोल देखील कोलमडून पडले आहेत. येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दासगावमधील आदिवासी महिला देखील झाडाची फांदीपडून जखमी झाली. लक्ष्मी तुकाराम जाधव असे या महिलेचे नाव असून तिला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दासगाव सह सापे गावात देखील वादळाने नुकसान झाले आहे. दासगाव आणि सापे गावात वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. अनेक वाहनांवर छप्पर तसेच झाडांच्या फांद्या पडल्याने नुकसान झाले आहे. दासगावप्रमाणेच परिसरात देखील या वादळी पावसाचा प्रभाव जाणवून आला आहे. या पावसाने आंबा पीक देखील धोक्यात आले आहे. आंबा उत्पादक आधीच कोरोनामुळे हवालदिल झाले असतानाच अचानक आलेल्या पावसाने आंबा उत्पादक हतबल झाले आहेत. त्याच प्रमाणे भातशेतीची कामे सुरू असतानाच पाऊस पडल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper
