माणगाव ः प्रतिनिधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली असून इयत्ता दहावीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन द्वितीय सत्राच्या अगोदरच कोरोनामुळे शाळांना सुटी जाहीर झाल्याने द्वितीय सत्र परीक्षा व विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम झाला होता. विद्यार्थी अभ्यासापासून दूर राहणे शैक्षणिकदृष्ट्या परवडणारे नसून यावर पर्याय म्हणून शाळा बंद, पण शिक्षण आहे ही संकल्पना रुजू होत आहे. समाजमाध्यमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास प्रवृत्त केले जाते. शिक्षण विभागाने यासाठी प्रयत्न केले असून दिक्षा शैक्षणिक अॅप व इतर दुवे वापरून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांमार्फत उद्युक्त केले जात आहे. शिक्षणात जास्तीत जास्त समाजमाध्यमांचा वापर करावा यासाठी शाळा, शिक्षक व पालकही आग्रही असून विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करीत आहेत. शिक्षकांनी इयत्तानुसार व्हॉट्सअॅप गट तयार केले आहेत. त्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना अभ्यास देऊन त्याची तपासणीही केली जाते.