नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 11) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे, मात्र कोरोनापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे सहा फूट अंतर ठेवणे कमी झाले तर फार मोठे संकट उभे राहिल, अशी भीतीही व्यक्त केली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन हेही उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, मजुरांची घरी जाण्याची गरज समजू शकतो, पण त्यामुळे कोरोना गावापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचल्यास ते पुढील आव्हान असेल. या वेळी हॉटस्पॉट असलेल्या शहरांत प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसर्दभातही पंतप्रधानांनी मार्गदर्शन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper