नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची मंगळवारी (दि. 12) घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे पॅकेज जीडीपीच्या 10 टक्के असल्याची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. त्यानंतर लॉकडाऊन पुढे वाढवले जाणार असून, 18 तारखेपूर्वी ते जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पॅकेजबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले असून, त्यातून सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यात येईल. देशासाठी दिवसरात्र झटणारे शेतकरी, मजूर तसेच प्रामाणिकपणे कर भरणार्या मध्यमवर्गीयांसाठी हे पॅकेज आहे. एकविसावे शतक भारताचे व्हावे हे आपले स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता त्यासाठी आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग आहे. जग संकटात असताना आपल्याला कठोर संकल्प करण्याची गरज आहे. आपला संकल्प या संकटापेक्षाही विराट असणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितले.
Check Also
दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…
एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …
RamPrahar – The Panvel Daily Paper