Breaking News

शेतकरी-शास्त्रज्ञ एकता चळवळ बळकटीकरणाचा निर्धार

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या अनेक समस्या आहेत, पण त्यांना कोणी वाली नाही. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची, संघटित होण्याची व शेतकर्‍यांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख यांनी येथे केले.

कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नुकतीच पालीपोटल येथील सुमंगलादेवी मंदिरात वि. रा. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत होते. शेतकर्‍यांनी उत्पादकता व उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

शेतकर्‍यांच्या गरजेनुसार भात बियाणे विकसित करण्यासाठी कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कटिबद्ध असल्याचे केंद्राचे भात विशेषज्ज्ञ डॉ. रमेश कुणकेरकर यांनी सांगितले. या वेळी त्यांनी कर्जत-9 या वाणाची माहिती दिली. विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ तसेच मंचाचे समन्वयक डॉ. रवींद्र मर्दाने यांनी एकात्मिक शेती पद्धतीची गरज प्रतिपादित केली. 

प्रगत शेतकरी निलिकेश दळवी यांनी भाजीपाला विक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सुजल अ‍ॅग्रोचे निलेश पाटील यांनी सीएमएजीपी व पीएमएजीपी योजनेची माहिती देत शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व्ही. एस. टी. टिलर्स ट्रॅक्टर लिमिटेडचे महाव्यवस्थापक विपणन मनीष सोमय्या यांनी शेतीसाठी लागणार्‍या यंत्रांची माहिती दिली. पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर कसबे, कृषिविद्यावेत्ता डॉ. अनंत दळवी, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा पाटील तसेच शेतकरी दशरथ मुने, बबन गुरव, अशोक पाटील, लक्ष्मण लोहकरे, पंढरीनाथ दाभाडे, हभप भरत महाराज देशमुख, चंद्रकांत मांडे यांचीही या वेळी समयोचित भाषणे झाली.

सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एन. एस. पाटील, आदिवासी विकास विभागाचे माजी उपायुक्त विकास देशमुख, सिडकोचे माजी कार्यकारी अभियंता रमाकांत झुंझारराव, वनपाल पी. वी. बागल, कृषी विभागाचे दत्तू देवकते यांच्यासह तालुक्यातील शेतकरी या बैठकीला  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply