अहमदाबाद ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीत भारताने 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांवर संपुष्टात आला, तर दुसर्या डावात इंग्लंडला केवळ 81 धावाच करता आल्या. दोन्ही डावांत मिळून इंग्लंडने 193 धावा केल्या. इंग्लंडच्या संघाचे दोन्ही डाव ज्या दिवशी सुरू झाले त्याच दिवशी संपले. अशा सुमार फलंदाजीमुळे इंग्लंडच्या संघाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून 200 धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणार्या इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले, तर अक्षर पटेलने 38 धावांत सहा बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला.
RamPrahar – The Panvel Daily Paper