टोकियो ः वृत्तसंस्था
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात शनिवारी (दि. 24) रौप्यपदक जिंकले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे पहिले, तर भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. पहिल्या प्रयत्नात मीराबाईने 84 किलो आणि दुसर्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले, मात्र तिसर्या प्रयत्नात ती 89 किलो वजन उचलण्यात अपयशी ठरली. स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले. 94 किलो वजनासह चिनी वेटलिफ्टर हौ झीहूने पहिले स्थान मिळवले. यानंतर मीराबाई चानूने आपल्या क्लीन अॅण्ड जर्कच्या दुसर्या प्रयत्नात 115 किलो वजन उचलून एक नवीन ऑलिम्पिक विक्रम केला, परंतु चीनच्या हौ झीहूने पुढच्या प्रयत्नात 116 किलो वजन उचलले. त्यानंतर चानूला झीहूच्या पुढे जाण्यासाठी 117 किलो वजन उचलण्याची गरज होती, पण ती त्यात अयशस्वी ठरली. यापूर्वी सिडनी ऑलिम्पिक (2000) मध्ये भारताने वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. कर्णम मल्लेश्वरीने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. दरम्यान, भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकणार्या मीराबाई चानूचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले.
मी सुवर्णपदक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण सुवर्ण जिंकू शकले नाही. जेव्हा मी दुसर्यांदा वजन उचलले तेव्हा मला समजले की, मी माझ्याबरोबर पदकही घेऊन येत आहे. पदक जिंकल्याबद्दल मला खूप आनंद झालाय.
-मिराबाई चानू