अलिबाग : प्रतिनिधी
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर रायगड जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा संपली आहे. शनिवारी (दि. 4) दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याचे पहावयास मिळाले.
यंदा मान्सून वेळेत दाखल झाला. नाममात्र हजेरी लावून वरुणराजाने दडी मारली होती. शुक्रवारी पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. त्यानंतर त्याचा जोर वाढत आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत होत्या. दुपारी वारेदेखील वाहत होते, तर समुद्रात लाटा उसळल्या.
जिल्ह्यात शनिवारी (दि. 4) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 60 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत 648 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलीमिटरमध्ये)
तळा 141, पनवेल 92.20, श्रीवर्धन 88, रोहा 83, उरण 73, मुरूड 69, सुधागड व म्हसळा प्रत्येकी 65, माणगाव 60, पोलादपूर 48, माथेरान 45.60, अलिबाग 45, पेण 40, खालापूर 34, कर्जत 14.60, महाड 12, एकूण 975.70, सरासरी 60.98
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper