Breaking News

‘मविआ’कडून ओबीसी समाजाची दिशाभूल

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात

नागपूर : प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केलाय.

राज्य सरकारचे सर्व मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत, पण आज राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होणार नाहीत, असे राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर निवडणुका लावल्या कशा? असा सवालही बावनकुळे यांनी केलाय.

‘राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड’

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका व्हाव्या अशा विचाराचा एक गट या सरकारमध्ये होता, शेवटी त्यांचा मनसुबा पूर्ण झाला. आज ओबीसी समाजावर अन्याय करणारा सर्वात मोठा निर्णय झाला. त्यामुळे पुढच्या काळात सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील. हा मोठा घात राज्य सरकारने ओबीसी समाजाबाबत केला आहे. ओबीसी समाज या सरकारला सोडणार नाही. भाजपने ओबीसी उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे, पण महाविकास आघाडी सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय. त्यामुळे ओबीसी समाज या सरकारचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी सरकारला दिलाय.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply