Breaking News

‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील सर्वांचे बाप होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे ‘दिबां’चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दांत नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 13) केली. ते पनवेल तालुक्यातील कोल्ही कोपर येथे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत बोलत होते. ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील, तर त्यांनी सत्ता सोडावी, अशी घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडिलांच्या नावाचा विचार न करता वडीलधारी ‘दिबां’चे नाव देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही ना. आठवले यांनी या वेळी केले.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून ‘दिबा’साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी भूमिपुत्र परिषद आयोजित करण्यात आली होती. सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला माजी खासदार जगन्नाथ पाटील, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉ. भूषण पाटील, ‘दिबां’च्या सहकारी व कोल्हापूरच्या माजी नगरसेविका भारतीताई पोवार, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, तसेच नंदराज मुंगाजी, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दशरथ भगत, उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, राजाराम पाटील, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, सुनील म्हात्रे, रूपेश धुमाळ, सदानंद वास्कर, कांचन घरत, सुनील पाटील, प्रशांत पाटील, गोवर्धन डाऊर, के. के. म्हात्रे, सीमा घरत यांच्यासह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आदी विभागांतील भूमिपुत्र उपस्थित होते. तत्पूर्वी ‘दिबां’च्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी, जन्मभूमी जासई येथे, तसेच गावोगावी ‘दिबां’च्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या वेळी ना. रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले की, ‘दिबां’चे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राहिला आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारला घेणे भाग पडले आहे. ‘दिबा’ संघर्षशील नेते होते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गौरवशाली कार्य केले आहे. समाजाला न्याय देण्याचा त्यांचा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे वाटेल ते झाले तरी चालेल, पण विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागले पाहिजे, असे सांगतानाच त्यांच्या नावासाठी आरपीआयचा जाहीर पाठिंबा आहे.
ना. आठवले पुढे म्हणाले की, रामशेठ ठाकूर आणि मी मित्र आहोत. ते एक दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. संघर्ष करून ते पुढे आले. ‘दिबां’च्या नेतृत्वाखाली संघर्ष करणारा माणूस म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. ‘दिबां’नी सर्वांसाठी संघर्ष केला. भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून ते जेलमध्येही गेले होते. सिडकोने जमिनी घेतल्या, मात्र प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाचा विचार सिडकोने केला नाही. गावांचे योग्य पुनर्वसन, बांधकाम परवानगी, रोजगार, नोकरी असे अनेक प्रश्न आहेत जे सिडको आणि राज्य सरकार सोडवू शकतात, पण ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे.
आपल्या भाषणात ना. आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत सिडको, ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. ‘दिबां’वर कविता सादर करीत त्यांना आदरांजली वाहिली आणि भीमशक्ती ‘दिबा’शक्तीमध्ये एकवटली असल्याचे अधोरेखित केले. न्याय मिळत नाही म्हणून मागण्यांसाठी हा एल्गार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून दोन ठराव जाहीर केले. काहीही झाले तरी ‘दिबां’च्या 100व्या जयंतीपूर्वी ‘दिबां’चे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे, तसेच सिडकोसंदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे, बहुजनांचे प्रश्न सुटलेच पाहिजे नाही तर 24 जानेवारीला विमानतळाचे काम करून द्यायचे नाही, असे दोन ठराव त्यांनी जाहीर करताच सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा गजर केला. ‘दिबां’च्या नावाचे आंदोलन आपले मानून सर्वांनी या लढ्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. आंदोलन होऊ नये यासाठी सिडकोने अनेक प्रयत्न केले, पण ‘दिबां’चे नाव प्रत्येक भूमिपुत्राच्या हृदयात असल्याने हे आंदोलन ‘दिबां’चे विमानतळाला नाव लागेपर्यंत सुरूच राहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीवाचे काहीही झाले तरी चालेल, पण ‘दिबां’चे नाव लागलेच पाहिजे हे भूमिपुत्रांनी दाखवून दिले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आमदार महेश बालदी यांनी म्हटले की, हा पोलीस आणि भूमिपुत्रांचा संघर्ष नाही, तर सिडको आणि भूमिपुत्रांचा आहे. त्यामुळे पोलिसांनी हे लक्षात घ्यावे, असे सांगतानाच गरीब भूमिपुत्रांचा आवाज सिडको आणि ठाकरे सरकारला का ऐकू येत नाही, असा सवालही उपस्थित केला. या वेळी माजी खासदार जगन्नाथ पाटील, कॉ. भूषण पाटील, दशरथ भगत, रूपेश धुमाळ, गुलाब वझे, संतोष केणे, जयेश आक्रे, प्रेम पाटील यांचीही भाषणे झाली.

धगधगती आग भूमिपुत्रांच्या मनात आहे. दृढनिश्चय असल्याने यशस्वी झाल्याशिवाय थांबायचे नाही. ‘दिबां’चे नाव आणि भूमिपुत्रांचे प्रश्न हे प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचे प्रश्न आहेत. ते सोडविल्याशिवाय शांत बसायचे नाही.
-लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

संघर्षाच्या योद्ध्याला सलाम -भारतीताई पोवार
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटीलसाहेबांनी भूमीच्या रक्षणासाठी जन्म घेतला. सिडकोने ‘दिबां’नाही त्रास दिला, परंतु सह्याद्रीच्या दगडासारखे ‘दिबा’ कणखर होते. संघर्षाच्या योद्ध्याला सलाम करण्यासाठी मी कोल्हापूरवरून आले आहे. संघर्ष पहायचा असेल तर आगरी-कोळी यांचा पाहा असे मी पश्चिम महाराष्ट्रात सांगत असते. पश्चिम महाराष्ट्रात ‘दिबां’सारखा नेता निर्माण झाला असता तर त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांवर बिकट परिस्थिती आली नसती. ‘दिबां’चे नाव विमानतळाला दिल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे या वेळी 1984 सालच्या गौरवशाली लढ्यातील अग्रणी महिला कार्यकर्त्या व कोल्हापूरच्या माजी नगरसेविका भारतीताई पोवार यांनी स्पष्ट केले.

…तोपर्यंत क्रांतीची धगधगती मशाल शांत करायची नाही; भूमिपुत्र परिषदेत इशारा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत, भूमिपुत्रांचे कैवारी, कष्टकर्‍यांचे असमान्य नेतृत्व, झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव लागलेच पाहिजे आणि तो प्रकल्पग्रस्त, स्थानिक, भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत क्रांतीची धगधगती मशाल शांत करणार नाही, असा इशारा या भूमिपुत्र परिषदेद्वारे सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला आहे.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील लागलेच पाहिजे ही भूमिका भूमिपुत्रांनी कायम ठेवत रणशिंग फुंकले आहे. सिडको आणि राज्य सरकारनेही ‘दिबां’च्या नावाचा ठराव करून तो प्रस्ताव केंद्र सरकारला द्यावा, अशी आग्रही मागणी भूमिपुत्रांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने लवकरच सिडकोसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्या अनुषंगाने भूमिपुत्रांच्या बाजूने सकारात्मक निर्णय न झाल्यास 24 जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद करण्याचा निर्धार गुरुवारी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भूमिपुत्र परिषदेमध्ये पुन्हा एकदा जाहीर करण्यात आला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी ‘दिबा’साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील समस्त भूमिपुत्रांची ’भूमिपुत्र परिषद’ तर 24 जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनाने कृती समितीला चर्चेला बोलावले होते. कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे परिषद व आंदोलन रद्द करावी, अशी सूचना व आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.  त्याचबरोबर  पोलिसांनी या प्रश्नासंबंधी सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर 20 जानेवारीपूर्वी बैठक घेण्याचे आश्वासित केले आहे. त्यामुळे आजची भूमिपुत्र परिषद मर्यादित स्वरूपात करण्याचे कृती समितीने जाहीर केले होते. त्यानुसार ही भूमिपुत्र परिषद दिलेल्या शब्दांप्रमाणे कोरोनाचे नियम पळून झाली, मात्र  सिडको व्यवस्थापकीय संचालकांबरोबर भूमिपुत्रांच्या बाबतीत प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जानेवारी रोजी काम बंद आंदोलन करण्याचा गर्भित इशारा देण्यात आला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply