श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात पनवेल तहसील कार्यालयासमोर मोर्चा

पनवेल : वार्ताहर
अद्यापही मुलभूत सोयी सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित असल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 25) श्रमजिवी संघटना-महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाला संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, जिल्हा महिला प्रमुख कुंदा पवार, तालुका अध्यक्ष बाळू वाघे, तालुका उपाध्यक्ष बाबुराव शिंदे, शहरप्रमुख राम नाईक, शेतकरी प्रमुख भगवान वाघमारे, कचरु कातकरी, तालुका उपाध्यक्ष सुमन नाईक, बाबुराव लेंडे, पंढरीनाथ कातकरी, संतोष वाघे, अरुण वाघमारे, तुळशीराम जाधव, बळीराम कातकरी, आनंदी कातकरी आदींसह शेकडो समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.
यामध्ये प्रामुख्याने त्यांनी अद्यापपर्यंत त्यांच्या आदिवासी वाड्यांना रस्ते नाही, वीज पुरवठा नाही, अनेक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ आहे तसेच कित्येक ठिकाणी रेशन धान्य सुद्धा देण्यात येत नाही किंवा देण्यात येणारे रेशन सुद्धा कमी प्रमाणात असते. विविध घरकूल योजना, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी त्याचप्रमाणे शासकीय योजनांचा फायदा या आदिवासी बांधवांना अद्यापपर्यंत मिळाला नाही.
राज्य सरकारने याकडे लक्ष घालून या सर्व योजना आदिवासी बांधवांना देण्यात याव्यात व त्यांना मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवू नये यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भातील निवेदन त्यांनी पनवेल तहसील कार्यालयाला दिले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper