मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टोला
पुणे ः प्रतिनिधी
संजय राऊत यांनी आता शांत बसावे. प्रत्येकाबाबत त्यांना काही ना काही बोलायचेच असते. ते किती बोलतात, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये बुधवारी
(दि. 9) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष ठाकरे बालत होते.
पुणे येथे झालेल्या मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले. संजय राऊत हे दररोज अत्यंत वाईट भाषेत आरोप-प्रत्यारोप करतायेत. महाराष्ट्रातल्या भविष्यातील पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की, लोकांनी तुम्हाला मतदान करावं?, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.
महिलांच्या प्रश्नांविषयी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी, नोकर्यांच्या मुद्यांवर, एसटीविषयीही राज्य सरकार बोलायला तयार नाही. जे लोक तुम्हाला मतदान करतात, त्यांचे आभार माना. कारण त्यातले एक टक्का लोकही तुमच्याकडे काही कामासाठी येत नाहीत. उगीच संपर्क कार्यालय उघडून बसतात, असा टोला त्यांनी लगावला.
RamPrahar – The Panvel Daily Paper