Breaking News

आपट्यातील तळे बनले कचराकुंडी

गावात घंटागाडी, पण कचरा तळ्याकिनारी

रसायनी ः प्रतिनिधी

रसायनी परिसरातील आपटा गावात पूर्वी सरदार बिवलकर यांनी ग्रामस्थांसाठी तळे निर्माण करून पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र सद्य स्थितीत य तळ्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. गावात ग्रामपंचायतीची घंटागाडी फिरत असूनही अनेक जण कचरा तळ्याच्या किनारी टाकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

आपटा गावात फार पूर्वी ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी तळे निर्माण करण्यात आले होते. पूर्वीच्या काळी या तळ्यातील पाण्याचा वापर महिला वर्ग भांडी व कपडे धुण्यासाठी करीत असत. तसेच याच तळ्याच्या पाण्यात गणपती विसर्जनही करण्यात येत होते. मात्र सद्य स्थितीत या तळ्याच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे.

एकीकडे शासन स्वच्छता अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे पाण्याचे स्त्रोत नागरिकांकडून अशा प्रकारे खराब करण्यात येत आहेत. गावात ग्रामपंचायतीची घंटागाडी दररोज गावातील कचरा जमा करण्यासाठी फिरत असते. मात्र तरीदेखील अनेक जण तळ्याच्या किनार्‍यावरी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. या कचर्‍यामुळे परिसरातही दुर्गंधीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत त्वरीत ठोस उपाययोजना करून तळ्याच्या परिसरात कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply