मुंबई : प्रतिनिधी
देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ तीन हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.
भायखळा येथे स्थित तृतीयपंथीयांच्या गुरूंच्या वसाहतीत जाऊन मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी भेट दिली. या वेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपजिल्हाधिकारी माधव पाटील, तृतीयपंथीयांचे गुरू, मुंबई किन्नर ट्रस्ट, किन्नर मॉ संस्थेचे सदस्य आदी उपस्थित होते. तृतीयपंथीयांचे प्रश्न, त्यांच्या समस्या भिन्न असून त्याबाबत राज्यातील सर्व शासकीय अधिकार्यांना त्याची माहिती असायला हवी. यासाठी राज्यभरातील तृतीयपंथीयांचे गुरू, शासकीय अधिकारी, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय परिषद घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांच्या अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शासकीय अधिकार्यांना एकत्रितपणे सादर करणार्या स्वयंसेवी संस्थांकरिता फेलोशिप देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत असून मुंबई शहरात त्यांच्या निवासाजवळ शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. ज्या तृतीयपंथीय व्यक्तींनी आपल्या नावाची नोंद तृतीयपंथी म्हणून केली नसेल, तर अशानींही आपल्या मतदान कार्डात तृतीयपंथी म्हणून बदल करावा, असे आवाहनही देशपांडे यांनी या वेळी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper