
उरण : वार्ताहर
40 ते 45 वर्षापूर्वी घराघरांत तांब्या-पितळेची भांडी वापरली जात असत. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रांत कमालीचा बदल झाला. त्याचप्रमाणे स्वस्त मिळणार्या आणि सहज स्वच्छ होणार्या चमकदार स्टील भांड्यांचे राज्य स्वयंपाक घरात सुरू झाले होते, पण या भांड्यांचे आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्या असलेले फायदे लक्षात आल्याने गृहिणी पुन्हा तांब्याची भांडी वापरू लागल्या आहेत.
अशी तांब्या-पितळेची भांडी तयार करणार्या व्यावसायिकांसह विक्रेत्यांनाही या ट्रेंडमुळे सोन्याचे दिवस आले आहे. दिवसेंदिवस तांब्याच्या भांड्यांना मागणी वाढू लागली आहे.
चार दशकांपासून तांब्याची भांडी स्वयंपाकघरातून हद्दपार झाली होती. आता पुन्हा या धातूच्या भांड्यांची मागणी वाढली आहे, असे नाईक अॅण्ड कंपनीचे रवींद्र नाईक यांनी सांगितले. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आणि शिजवलेले अन्न आरोग्यवर्धक असते. त्याची चवही चांगली असते.
तांब्याची भांडी लवकर तापत असल्याने इंधनाची बचत होते. ती फुटल्यास दुरुस्ती करता येतात. मोडीत विकल्यास रिसेल व्हॅल्यु मिळते. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. लग्नसराई सुरू असल्याने हंडा, कळशी, ताम्हण, गडू, पळी, पंचपात्र आणि समई या वस्तू कन्यादानासाठी लग्नसराईत अधिक खरेदी करतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper