Breaking News

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा…!

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व…

स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देणं नाकारलं होतं. आपली मुंबई हिसकावून घेण्याची चीड मराठी माणसांमध्ये धुमसत होती.

संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी व्यासपीठ असावे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रा. मधु दंडवते इत्यादी अनेक महत्त्वांच्या व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्र निर्मीतीसाठी मोलाचे योगदान दिले.

21 नोव्हेंबर 1956 रोजी कामगारांचा एक भव्य मोर्चा मुंबईतील फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसर्‍या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत होता. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. तरी पोलिसांना हा मोर्चा आवरेना. पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. अखेर सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. हुतात्म्यांच्या बलिदानार्थ 1965 मध्ये हुतात्मा स्मारकाची निर्मिती करण्यात आली.

1 मे 1960 हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस. या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मंत्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे या दिवसाला ’सोन्याचा दिवस’ असे संबोधले होते. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलले होते, की ’महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस आले असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे.

महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला यत्किंचितही थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो, असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.

‘माझा महाराष्ट्र हा मला प्राणापेक्षा प्रिय असल्याचे कवीवर्य श्री. कृ. कोल्हटकर यांनी म्हटले होते. तसेच कवी कुसुमाग्रज हे आपल्या कवितेत म्हणतात की, ’माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा, तिच्यासंगे जागतील मायदेशातील शिळा’.

साभार वेबदुनिया, झी 24 तास

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply