Breaking News

कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस

पुढील दोन दिवस काही भागांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिम किनार्‍यावर द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याने जुलैची सरासरी ओलांडली आहे. संपूर्ण कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.
राज्यात रायगड, पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईत पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर 12 जुलैला पूर्व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
रायगडात रेड अलर्ट
हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात 11 ते 14 जुलै या कालावधीत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम

स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, लोकप्रतिनिधी सत्कार, गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्टे …

Leave a Reply