Breaking News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. 23) येथे केले. भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या, ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विजया रहाटकर, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार संजय कुटे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार श्रीकांत भारतीय व्यासपीठावर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत भाजपने राज्यात विविध निवडणुका जिंकल्या व जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला. आघाडी सरकारने भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण एकही कार्यकर्ता डगमगला नाही. कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदु्त्व संकटात आले. नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार -सी. टी. रवी

राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी यांनी सांगितले की, राज्यातील राजकीय परिवर्तनामुळे केंद्र सरकारच्याच विचारांचे विकासाचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आगामी काळात कठोर परिश्रम करून संघटना आणखी मजबूत करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत.

जनादेशाचा सन्मान, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सामान्यांची सुरक्षितता आणि हिंदुत्व यासाठी भाजप- शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. भाजपला जनमत अनुकूल आहे. संघटनात्मक बांधणीत आता मोठी झेप घ्यायची आहे.

-शिवप्रकाश, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री, भाजप

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply