Breaking News

पनवेल रेल्वेस्टेशनवर सुरक्षा वाढविणे गरजेचे

राज्याची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा बॉम्बने उडविण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिल्याने मुंबईसह राज्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. शहरात आणि महत्त्वाच्या रेल्वेस्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. यामध्ये पनवेल स्टेशनचाही समावेश आहे, पण मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या पनवेल रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या बाबतीत काहीसे दुर्लक्ष होत आसल्याचे दिसून येत आहे. येथील प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी असलेले स्कॅनिंग मशीन गेल्या सहा वर्षांपासून बंद स्थितीत आहे. नवीन मशीन देण्याबाबत  मागणी करून ही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता मात्र दहवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पनवेल रेल्वेस्थानकावर नवीन स्कॅनिंग मशी बसविण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे.

पनवेल रेल्वेस्टेशनवरील स्कॅनिंग मशीन सप्टेंबर 2016 पासून  बंद होते. त्यानंतर हे मशीन पनवेल रेल्वेस्टेशनमधून गायब झाल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केली असता तत्कालीन रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी गोरंबे यांनी सदर मशीन भंगारमध्ये निघल्याची माहिती दिली होती. नवीन मशीन अद्याप मिळाले नसल्याचे व कधी मिळेल हे सांगू शकत नसल्याचे सांगितले होते. याला ही आज सहा वर्षे झाली आहेत. आज पुन्हा मुंबई रेल्वे दहशतवाद्यांच्या टारगेटवर असल्याचे सांगण्यात येत असल्याने स्कॅनिंग मशीनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पनवेल रेल्वे स्टेशन हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. कोकण किनारपट्टीवरुन अतिरेकी मुंबईत प्रवेश करू शकतात. या किनारपट्टीवर शस्त्र किवा दारूगोळा उतरवण्याची शक्यता गुप्तहेर संघटनांकडून वारंवार सांगितली जाते. याचा अनुभव ही 1992च्या मुंबई बॉम्बस्फोटाचे वेळी आला आहे. पनवेल रेल्वेस्टेशनवर बाहेरून येणार्‍या गाड्या व येथून इतर ठिकाणी जाणार्‍या गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या स्थानकावर कडक तपासणी होणे गरजेचे असताना आज या स्थानकावर सुरक्षा व्यवस्था नसल्यातच जमा असते.

पनवेल स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या फलाट क्रमांक 5, 6 व 7 वर येतात, तर लोकल गाड्या एक ते चार क्रमांकाच्या फलाटावर येतात. स्टेशनमध्ये येण्यासाठी पूर्वेकडून म्हणजेच नवीन पनवेल आणि पश्चिमेकडून म्हणजेच पनवेल कडून गेट आहेत. फलाट क्रमांक 5वरील मेल गाड्यांच्या  बुकिंग ऑफिस  जवळील गेटवर स्कॅनिंग मशीन होते. त्याचा उपयोग प्रवाशांचे सामान तपासण्यासाठी होत होता.

मध्य रेल्वेच्या या स्टेशनवरुन करोंनापूर्वी  फलाट क्रमांक 1 ते 4 वरुन रोज 333 लोकलच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, ठाणा आणि अंधेरी अशा फेर्‍या होत्या. याशिवाय फलाट 5 ते 7 वरुन मेल व एक्सप्रेसच्या नियमित 57 आणि 3 होलीडे एक्सप्रेस गाड्या जात होत्या. आजही अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांनी  आणि  लोकलने जाणार्या प्रवाशांची संख्या लाखात आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सध्या स्कॅनिंग  मशीनच नसल्याने रेल्वेस्टेशनवर  मोठमोठ्या बॅगा घेऊन येणार्‍या संशयित प्रवाशाची कोणतीही तपासणी होताना दिसत नाही. पोलिसांचे  डॉग स्कोड  मात्र नियमित स्टेशनवर येऊन जात असते.

पनवेल हे मध्य रेल्वेचे हार्बर लाईनवरील शेवटचे स्टेशन आहे. नैना प्रोजेक्ट आणि नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ यामुळे  भविष्यात या स्टेशनला महत्त्व येणार असल्यानेच त्याचा विस्तार करण्याचे काम रेल्वेने सुरू केले आहे.

या स्टेशनचे महत्व आणि येथील प्रवाशांची संख्या पहाता, अतिरेक्यांच्या हीट लिस्टवर हे स्टेशन असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लाखो प्रवाशी ये-जा करीत असलेल्या या स्टेशनवर प्रवाशांचे सामान स्कॅन करण्याचे मशीन लवकरच मिळणणार की वराती मागून घोडे या म्हणी प्रमाणे रेल्वेचे अधिकारी एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जागे होणार? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

पनवेल स्टेशनवरील स्कॅनिंग मशीन मी येथे येण्यापूर्वीच नेले असल्याने मला त्याबद्दल नक्की माहिती नाही, पण धोका लक्षात घेऊन येथे प्रवाशांच्या बॅग तपासण्यासाठी वरिष्ठांकडे  हँड स्कॅनिंग मशीन मागितले होते ते काही दिवसांपूर्वी मिळाले आहे. त्याच्या मदतीने आम्ही बॅगांची तपासणी करतो. याशिवाय गणेशोत्सवासाठी होणार्या गर्दीच्या बंदोबस्तासाठी 30 जादा कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे.

-जसबीर राणा, निरीक्षक, रेल्वे  पोलिस फोर्स

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply