आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी
नवी मुंबई ः बातमीदार
नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सध्या याची दूरवस्था झाली आहे. तलावाची स्वछता करून सुशोभीकरण करावे, भगवान गौतम बुद्धांचा पुतळा बसवण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांना एका निवेदनात केली आहे.या निवेदनात आमदार मंदाताई म्हात्रे यांनी म्हंटले आहे की, सुप्रसिद्ध ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे पर्यटकही दैनंदिन फिरायला येत असतात. रोज ज्येष्ठ नागरिक व महिला येथे मॉर्निंग वॉकसाठी येत असतात, परंतु या तलावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून तलावात गाळ साचला आहे. तलावात परिसरातील सांडपाणी सोडले जात असून कचरा व निर्माल्यही टाकले जाते. तसेच शेवाळे वनस्पती तसेच आजुबाजूचे सांडपाणी यामुळे तलाव प्रदूषित झाला असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असून तलाव सुस्थितीत रहावा म्हणून महापालिकेकडून नेहमीच दुर्लक्ष होत आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे, तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तलावात साचलेला गाळ काढणे, तलावातील अनावश्यक वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणणे, किनारा सौंदर्यीकरण, कुंपण घालणे, जॉगिंग ट्रॅक करणे तसेच उद्यान विकसित करणे, कारंजा उभारणे व भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारणे अशा मुख्य कामांनी तलावाचा विकास करणे आवश्यक आहे, तसेच आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण केल्यास पर्यटकांची संख्याही वाढेल.
Check Also
झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!
‘पुरवैय्या’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …
RamPrahar – The Panvel Daily Paper