Breaking News

नेरूळ-उरण रेल्वेमार्गावरील स्थानकांना महसुली, ऐतिहासिक, पारंपरिक गावांची नावे द्या

आमदार महेश बालदी यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
नेरूळ-उरण रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या स्थानकांची महसुली तसेच ऐतिहासिक व पारंपरिक गावांनुसार ओळख कायम राहावी या अनुषंगाने रेल्वेस्थानकांना नावे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे मंगळवारी (दि. 23) दिल्ली येथे भेट घेऊन केली.
या वेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बोकडवीरा ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष व सरपंच मनोज पाटील, नवघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच रवी वाजेकर, धुतूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद ठाकूर आदी उपस्थित होते.
मुंबईला थेट उरण शहराशी जोडणार्‍या बहुप्रतीक्षित नेरूळ-उरण रेल्वेमार्गाच्या दुसर्‍या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या नेरूळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी रेल्वे काही दिवसांतच थेट उरणला पोहचणार आहे. हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर सीएसटीहून रेल्वेने थेट उरणला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या महिनाभरात नेरूळ-उरण रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वेकडून मिळाले आहेत.
नेरूळ-उरण मार्गावरून रेल्वे धावताना महसूल अधिकार क्षेत्रात उभारण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाला त्याच गावाचे देणे उचित ठरणार असून त्या ठिकाणी इतर नाव दिल्यास अन्यायकारी होणार आहे. याचा विचार आणि लोकभावना लक्षात घेता फक्त द्रोणागिरी असा उल्लेख न करता बोकडवीरा द्रोणागिरी, न्हावा शेवाऐवजी नवघर, रांजणपाडाऐवजी धुतूम असा करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी या बाबतीत लक्ष घालून ग्रामस्थांच्या मागणीला न्याय मिळेल, असे आश्वस्त केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply